आई
आज आईला जाऊन एक वर्ष झाले. जणू एक वादळी आयुष्याचा प्रवास थांबला. व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्याबद्दल जास्त खोल आतून विचार सुरु होतो. सोबत असताना प्रेम, काळजी, विश्वास सगळं असतं. पण एक व्यक्ती म्हणून तितका विचार केला गेलेला नसतो. आता जेंव्हा आई सोबत नाही तेंव्हा कळतं की ती अप्रतिम स्त्री होती. सुशिक्षित, सुविचारी, कष्ट करत राहणारी, हसतमुख आणि विनोदबुद्धी असलेली.सोबत उत्तम माणूस. आई आमच्या कुटुंबाला व्यापून राहिली…आयुष्यभर. तिच्या शिवाय घर, शेती, व्यवहार सगळं म्हणजे शून्य. आता वाटतं तिने या व्यवहारपूर्ण, समंजस, सदसदविवेक बुद्धीने वागण्याची सुरुवात कुठून तरी केली असणार. अनुभव घेत घेत ती अशी बनली असणार. तिच्या वागण्याचा, बोलण्याचा पायचं मुळात समजूतदार आणि माणुसकी त्यामुळे तिने कधीच कुणालाही दुखावले नाही. जुन्या काळातील मॅट्रिक मेरिट मध्ये पास असं तिचं शिक्षण. वाचन, रांगोळी यांचे वेड. वडिलांच्या अतिशय शिस्तप्रिय आईच्या प्रेमळ वातावरणात तिचं बालपण गेलं. वडिलांसोबत सर्वत्र फिरल्यामुळे तिला समाजभानही चांगले होते. ती जेव्हा पप्पांसोबत लग्न होऊन मौजे वडगावला आली सामान्य मुल...